मध्य प्रदेशातील 'मिनी मुंबई' समजल्या जाणाऱ्या इंदूरमधील ब्रजेश्वरी एनेक्स भागातील एका तीन मजली घरात आनंदाचं वातावरण होतं. घरात नवीन पाहुणा येणार होता, त्याची जय्यत तयारी सुरू होती. पण एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं आणि उरल्या त्या फक्त काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आठवणी.
मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यानची ती रात्र पुगालिया कुटुंबासाठी अखेरची ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. रात्रीचे 3.30 किंवा 4 वाजले असावेत, संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होतं. घराबाहेर उभलेली इलेक्ट्रिक कार (EV) चार्जिंगला लावलेली होती. प्राथमिक अंदाजानुसार, चार्जिंग स्लॉटमध्ये अचानक एक जोरदार ठिणगी उडाली आणि शॉर्ट सर्किट झालं. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केलं आणि घराच्या वरच्या मजल्यापर्यंत आगीचे लोळ पोहोचले.
advertisement
आग वाढताच घरातील गॅस सिलिंडर आणि एसी (AC) च्या कंप्रेसरमध्ये एकामागून एक भीषण स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की, शेजारील घरांच्या भिंतींनाही तडे गेले. पुगालिया यांच्या घरी बिहारहून काही पाहुणे उपचारासाठी आले होते, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. आगीचा धूर इतका विषारी आणि दाट होता की कुणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
'डिजिटल लॉक' ठरला यमदूत
या दुर्घटनेतील सर्वात भयानक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे, कुटुंबाने सुरक्षेसाठी लावलेले 'डिजिटल इलेक्ट्रॉनिक लॉक'. शॉर्ट सर्किट होताच घराची वीज गुल झाली आणि ते आधुनिक ताले जाम झाले. वीज नसल्यामुळे ते दरवाजे उघडलेच नाहीत. घरचे सदस्य दरवाजा ठोकत राहिले, आरडाओरडा करत राहिले, पण तो स्मार्ट दरवाजा काही उघडला नाही. घराचे वरचे गेटही बंद असल्याने कोणाला गच्चीवरही जाता आले नाही. अग्निशमन दलाला तीन मृतदेह पायऱ्यांवरच पडलेले आढळले, जे जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.
8 महिन्यांची गर्भवती आणि बाळ...
या आगीत मनोज पुगालिया यांच्यासह त्यांची मोठी सून सिमरन हिचाही मृत्यू झाला. सिमरन 8 महिन्यांची गर्भवती होती. ज्या घरात काही दिवसात पाळणा हलणार होता, तिथे एकाच वेळी 8 अर्थ्या निघाल्या. या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हळहळत आहे.
मृतांची नावे:
मनोज पुगालिया (65) सिमरन पुगालिया (30) - (गर्भवती सून) विजय सेठिया (65) आणि सुमन सेठिया (60), कार्तिक सेठिया (22), रुचिका जैन (52), राशी जैन (12), तन्मय जैन (6) होते.
तंत्रज्ञान की जीवघेणा धोका?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मात्र, हा अपघात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे:
1. ईव्ही चार्जिंग सेफ्टी: आपण ईव्हीला प्रोत्साहन देत आहोत, पण त्यांचे चार्जिंग मानक सुरक्षित आहेत का?
2. डिजिटल लॉकची मर्यादा आपत्कालीन स्थितीत जर वीज गेली, तर हे डिजिटल लॉक मृत्यूचा सापळा तर बनत नाहीत ना? इंदूरमधील ही दुसरी घटना आहे जिथे डिजिटल लॉकमुळे लोकांचा जीव गेला.
आज पुगालिया कुटुंबाचं ते जळालेलं घर एक मूक किंकाळी फोडत आहे. आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत आपण सुरक्षेच्या पायाभूत गोष्टी विसरतोय का?
