सोन्यासारखा परतावा मिळेल या आशेने मध्यमवर्गीयांनी आपली आयुष्यभराची पुंजी त्याच्या हातात सोपवली, पण तो मात्र हे हजारो कोटी रुपये घेऊन गायब झाला. आता याच पर्ल्स महाघोटाळ्यावर सक्तवसुली संचालनालयाने आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार केला असून, एकाच फटक्यात ५,००त कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
पंजाबच्या एका छोट्या गावात दूध विकणाऱ्या निर्मल सिंह भंगूने १९९० च्या दशकात लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायला सुरुवात केली. 'जमीन घ्या आणि पैसे पाच ते दहा वर्षात डबल करा' असं आमिष त्याने दाखवलं. त्याने तब्बल ७० लाख एजंट्सची फौज तयार केली.
advertisement
हे एजंट खेड्यापाड्यांत, मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये फिरून लोकांच्या कष्टाचे पैसे गोळा करायचे. विशेष म्हणजे, लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी भंगूने चक्क आयपीएल टीम स्पॉन्सर केली होती आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार ब्रेट लीला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं होतं.
ED ची सर्वात मोठी धाड
२० मार्च २०२६ रोजी ईडीने दिल्ली आणि पंजाबमध्ये जी कारवाई केली, ती तपास यंत्रणेच्या इतिहासातील सर्वात मोठी जप्ती ठरली आहे. एकाच दिवशी १२६ मालमत्ता जप्त करून ईडीने साडेपाच कोटी गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा जिवंत केल्या आहेत. या ताज्या कारवाईसह, आतापर्यंत या घोटाळ्यात जप्त केलेल्या एकूण संपत्तीचे मूल्य २२,६५६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
काय होती ही पोंझी स्कीम?
भंगूने पीएसीएल आणि पीजीएफ या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांना गंडवायला सुरुवात केली. तो लोकांना सांगायचा की, कंपनी शेतीसाठी जमीन खरेदी करते आणि विकसित करते. गुंतवणूकदारांना ठराविक हप्त्यांत पैसे भरावे लागत.
५ वर्षांनी पैसे किंवा जमीन, असा पर्याय देते तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही घेऊ शकता. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच सुरू होतं. नवीन गुंतवणूकदारांच्या पैशातून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात होता. जेव्हा नवीन गुंतवणूक येणं बंद झालं, तेव्हा हा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.
सीबीआयने २०१६ मध्ये निर्मल सिंह भंगू यांना अटक केली होती. त्यानंतर तो तिहार जेलमध्ये होता. मात्र, २४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मास्टरमाईंड तर गेला मात्र सध्या सगळी संपत्ती ईडीच्या ताब्यात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश आर. एम. लोधा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून, ही समिती आता जप्त केलेल्या मालमत्ता विकून लोकांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करत आहे. साडेपाच कोटी लोक, ज्यात प्रामुख्याने शेतकरी आणि मध्यमवर्गीय आहेत, त्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी पर्ल्समध्ये लावली होती. २२ हजार कोटींची मालमत्ता आता ईडीच्या ताब्यात असल्याने, लिलावाची प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.
