परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की अशा हल्ल्यांची तीव्रता सतत वाढत आहे. त्यामुळे निरपराध नागरिक तसेच भारतीय क्रू सदस्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडत समुद्री व्यापाराची स्वातंत्र्य (Freedom of Navigation) अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच नागरी जहाजांना कोणत्याही लष्करी कारवायांपासून दूर ठेवले पाहिजे, असेही भारताने नमूद केले.
advertisement
होर्मुजच्या खाडीत मिसाइल हल्ल्याने हादरले मालवाहू जहाज
थायलंडचे मालवाहू जहाज ‘मयूरी नारी’ (Mayuree Naree) संयुक्त अरब अमिरातीतील खलिफा पोर्ट येथून भारतातील कांडला बंदराकडे येत होते. दरम्यान समुद्रातच या जहाजावर हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजातून काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसले. या घटनेचे फोटो रॉयल थाई नेव्हीने जाहीर केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 30 हजार टन वजनाच्या या विशाल जहाजावर एका प्रोजेक्टाइलने (मिसाइल किंवा ड्रोन) हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी हे जहाज ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होते. सुदैवाने ओमानच्या नौदलाने तत्परता दाखवत जहाजावरील 20 क्रू सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र अद्याप चालक दलातील तीन सदस्य बेपत्ता असल्याची माहिती असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे.
जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर संकटाची शक्यता
होर्मुज जलडमरूमध्य हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. इराणने आपल्या शेजारी देशांच्या शिपिंग मार्गांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक ऊर्जा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिप-ट्रॅकिंग वेबसाइट्सच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर ‘मयूरी नारी’ या जहाजाचा वेग फक्त एक नॉटपर्यंत कमी झाला होता. ही घटना त्या तीन व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेचा भाग असू शकते, ज्याबाबत युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने यापूर्वीच इशारा दिला होता.
