भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे खतांची आयात. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा मध्य-पूर्वेतील देशांकडून आयात करतो.
नैसर्गिक वायूचा तुटवडा: युरिया आणि इतर रासायनिक खते तयार करण्यासाठी 'नैसर्गिक वायू' हा मुख्य घटक लागतो. इराण-अमेरिका संघर्षामुळे वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
advertisement
आखाती देशांतून 'युरिया' बनवण्यासाठी लागणारा नैसर्गिक वायू आणि सल्फर, अमोनिया यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात येतात. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने हा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
परिणामी खतांच्या किमती गेल्या दोन आठवड्यात 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर खत महागले, तर शेतीचा खर्च वाढेल आणि पर्यायाने गहू, तांदूळ आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडतील. म्हणजे युद्धाची झळ थेट तुमच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे.
जगातील 30% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची वाहतूक हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. युद्धामुळे हा मार्ग असुरक्षित झाल्याने मालवाहू जहाजांना आफ्रिकेच्या 'केप ऑफ गुड होप'ला वळसा घालून यावे लागत आहे. जहाजांचा प्रवास 15-20 दिवसांनी वाढल्यामुळे मालवाहतुकीचे भाडे (Freight Rates) दुपटीने वाढले आहे. तसेच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे शेतातून शहरापर्यंत भाजीपाला आणि धान्य आणण्याचा खर्च वाढला आहे. यामुळेच गल्लीबोळातील हॉटेलपासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत सर्वच ठिकाणी जेवण महाग झाले आहे.
थोडक्यात सांगायचे तर...
इराण आणि अमेरिका यांच्यातील हे युद्ध आता भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आणि मध्यमवर्गीयांच्या खिशासाठीही धोकादायक ठरू लागला आहे. जर हा संघर्ष लवकर निवळला नाही, तर येत्या काळात सर्वसामान्यांना केवळ इंधनासाठीच नव्हे, तर पोटाच्या पाण्यासाठीही मोठी किंमत मोजावी लागेल.
