पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आत्मनिर्भर भारतावर जोर देताना स्वदेशीचे महत्त्व अधोारेखित केले. त्याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एखादी व्यक्ती जितकी जास्त इतरांवर अवलंबून असते तितकेच त्याच्या स्वातंत्र्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. जेव्हा एखाद्याला अवलंबून राहण्याची सवय लागते तेव्हा ते दुर्दैवी ठरते. आपण स्वावलंबन कधी सोडतो आणि कधी आपण कोणावर अवलंबून राहतो हे आपल्याला कळत नाही, असेही त्यांनी सांगितले. स्वदेशी हे हतबलता, नाईलाज म्हणून नव्हे तर मजबुतीचा दृढनिश्चय आहे. व्यापाऱ्यांनी देखील दुकानावर स्वदेशी वस्तू विकत असल्याचे फलक लावावे असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
पंतप्रधान मोदींकडून मिशन सुदर्शन चक्रची घोषणा...
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या 10 वर्षांत ती पुढे नेली जाईल. ही संपूर्ण आधुनिक प्रणाली, तिचे संशोधन, विकास आणि उत्पादन देशातच केले जाईल. ही एक अशी प्रणाली असेल जी युद्धाच्या पद्धतीनुसार भविष्यातील शक्यतांची गणना करून विकसित केली जाईल. ती अतिशय अचूक असेल. या सुदर्शन चक्राद्वारे देखील आपण लक्ष्यित, अचूक शस्त्रे विकसित करण्यात पुढे जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ही प्रणाली कार्यरत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घुसखोरांना सोडणार नाही, आता लपण्यास देशात जागा मिळणार नाही...
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात घुसखोरीच्या मुद्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज मी देशाला एका चिंतेचा आणि आव्हानाचा इशारा देऊ इच्छितो. एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत, देशाची लोकसंख्या बदलली जात आहे. एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत. हे घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत. हे घुसखोर माझ्या देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे घुसखोर आदिवासींच्या घरात घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करत आहेत. देश हे सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, जेव्हा सीमावर्ती भागात लोकसंख्याशास्त्रात बदल होतो तेव्हा देशाच्या सुरक्षेवर संकट येते. सामाजिक तणावाची बीजे पेरली जातात. कोणताही देश आपला देश दुसऱ्यांच्या हाती सोपवू शकत नाही. आपल्या पूर्वजांनी बलिदान आणि हौतात्म्याने स्वातंत्र्य मिळवले असल्याचे त्यांनी म्हटले. आता सरकार घुसखोरांविरोधात पावले उचलणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.