दरम्यान, कीवमध्ये आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे, ती म्हणजे, भारतीय वंशाचे मनीष दवे यांच्या 'साथिया' रेस्टॉरंटची. खरं तर, 'साथिया' हे युद्धग्रस्त युक्रेनमधील लाखो लोकांसाठी आश्रयस्थान आणि कठीण काळात हमखास अन्न मिळण्याचं ठिकाण बनलं. युद्धामुळे बेघर झालेल्यांना या रेस्टॉरंटचा मोठा आधार मिळाला. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला केला होता. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात कीवमधील लाखो नागरिक घरं उद्ध्वस्त झाल्यानं बेघर झाले आहेत. घरच नसल्यानं लाखो लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल होतायत. अशा परिस्थितीत कीवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना घरचं जेवण मिळावं या उद्देशानं रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या मनीष दवे यांनी केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर कीवमधील सर्व गरजूंसाठी रेस्टॉरंटचे दरवाजे खुले केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि टेलिग्रामवर ही माहिती शेअर केली आणि अनेक नागरिकांना आसरा दिला.
advertisement
युद्धादरम्यान मनीष यांचं रेस्टॉरंट बंद करण्यात आलं होतं. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये तळघरही आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मोठ्या संख्येनं नागरिक तिथे आश्रय घेण्यासाठी आले. एकेकाळी 130 हून अधिक लोक त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आसरा घेत होते. त्यांनीही सर्वांचं मोकळ्या मनानं स्वागत केलं.
वाचा - PM मोदी आणि झेलेन्स्कींच्या चर्चेत या भारतीय महिलेची मोठी भूमिका; कोण आहेत?
मनीष आणि त्यांच्या 11 कर्मचाऱ्यांनी सर्वांसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था केली. संचारबंदी शिथिल झाली की ते जवळच्या मॉल्समध्ये रांगेत उभे राहायचे आणि रेशन खरेदी करायचे. याशिवाय आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनीही त्यांना खाद्यपदार्थ दिले. पण गेल्या मार्चमध्ये भारत सरकारने युक्रेनमध्ये बचावकार्य सुरू केल्यावर ते शेवटच्या विमानानं भारतात परतले. मनीष गुजरातचे रहिवासी आहेत, परत येताना त्यांनी आपल्या रेस्टॉरंटच्या चाव्या शेजाऱ्यांकडे दिल्या.
साथिया रेस्टॉरंटमुळे कठीण काळात खऱ्या मित्राप्रमाणे गरजूंना आधार मिळाला हे नक्की.
