मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या घनदाट जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि सुरक्षा दलांच्या पथकाने शुक्रवारी रात्रीपासूनच घेराबंदी सुरू केली होती. शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जवानांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले, मात्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
advertisement
सुकमात १२, तर विजापूरमध्ये २ नक्षली ठार
सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नक्षलवाद्यांची दाणादाण उडाली. सुकमा जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले, तर शेजारील विजापूर जिल्ह्यात झालेल्या कारवाईत २ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आतापर्यंत एकूण १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी हस्तगत केलं असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
ऑपरेशन अजूनही सुरूच
बस्तर विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. चकमक थांबली असली तरी घनदाट जंगलात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे परिसरात मोठं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या वर्षभरात छत्तीगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश आले असून, गेल्या वर्षभरात तब्बल २८५ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. आजच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कंबरडे मोडले असल्याचे बोलले जात आहे.
