अजित पवारांच्या अपघाताची घटना ताजी असताना आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडींग करावं लागलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य शनिवारी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनऊहून कौशांबीकडे जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला लखनऊ विमानतळावर तातडीने 'इमर्जन्सी लँडिंग' करावं लागलं. हेलिकॉप्टरच्या कॅबिनमध्ये अचानक धूर भरू लागल्याने मोठी खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे सर्व जण सुखरूप आहेत.
advertisement
नेमकी घटना काय?
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे शनिवारी सकाळी १०:३० वाजता एका नियोजित कार्यक्रमासाठी लखनऊहून कौशांबीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी लखनऊ येथील एका कॉलेज मैदानावरील हेलिपॅडवरून उड्डाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या डॅशबोर्डवरील 'डिस्प्ले' अचानक बंद पडला. त्याच वेळी हेलिकॉप्टरच्या आत धूर जमा होऊ लागल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकांनी तत्काळ लखनऊ विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंग केलं.
पाच जणांचा जीव धोक्यात
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जण स्वार होते. यामध्ये मौर्य यांचे सहकारी विवेक आणि दोन अनुभवी वैमानिकांचा समावेश होता. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर हवेत असताना सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता, परंतु वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
या घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात आली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले की, "उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सुखरूप राहावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो." राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी व्यक्त केलेल्या या सद्भावनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
