बफे म्हणतात, वर्षानुवर्षांच्या गुंतवणूक अनुभवातून त्यांनी पाहिले आहे की आर्थिक संकटे बहुतेक वेळा मोठ्या निर्णयांमुळे नाही; तर छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होतात. जर मिडल क्लासला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हायचे असेल, तर या पाच गंभीर चुका टाळणे अत्यावश्यक आहे.
1) क्रेडिट कार्डच्या जास्त व्याजाचा सापळा
वॉरेन बफेंच्या मते क्रेडिट कार्डवरील जास्त व्याज ही मिडल क्लासची सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे. 18 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदराने घेतलेले कर्ज फेडण्याआधी कुठेही गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःच नुकसान करून घेणे.
advertisement
बफे स्पष्टपणे सांगतात 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारी गुंतवणूक क्वचितच असते. त्यामुळे सर्वप्रथम क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.
2) गरजेपेक्षा महागडी, नवी कार
कार ही वाहतुकीची सोय आहे, स्टेटस सिंबॉल नाही, असे बफे ठामपणे सांगतात. त्यांनी स्वतः अनेक वर्षे जुनी कार वापरली होती. मिडल क्लास मात्र नवीन कारच्या नादात कर्जाच्या जाळ्यात अडकतो.
कारची किंमत वेळोवेळी घटत जाते, पण कर्जाचा हप्ता मात्र कायम राहतो. यामुळे गुंतवणुकीसाठी वापरता येणारा पैसा EMI मध्ये अडकतो आणि संपत्ती वाढण्याऐवजी कमी होते.
3) जुगार आणि लॉटरीत नशीब आजमावणे
लॉटरी किंवा जुगारातून पैसा मिळेल, ही आशा मिडल क्लासची आणखी एक मोठी चूक असल्याचे बफे सांगतात. अशा नशिबाच्या खेळांमध्ये बहुतेक वेळा नुकसानच होते.
थोडी रक्कम वाटली तरी ती वारंवार खर्च होत राहते आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. त्याऐवजी पैसा अशा व्यवसायात किंवा गुंतवणुकीत लावावा जो कालांतराने मूल्य वाढवेल.
4) गरजेपेक्षा मोठे घर
बफे यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, अब्जावधींची संपत्ती असूनही ते आजही 1958 मध्ये खरेदी केलेल्या साध्या घरात राहतात. त्यांच्या मते घर हे राहण्यासाठी असते, प्रतिष्ठा दाखवण्यासाठी नाही.
मिडल क्लास कुटुंबे मात्र क्षमतेपेक्षा मोठे घर घेण्यासाठी मोठे कर्ज उचलतात. परिणामी आयुष्यभराची कमाई घराच्या हप्त्यांत खर्च होते आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी हातातून निघून जाते.
5) पटकन श्रीमंत होण्याची घाई
“आज तुम्ही ज्या झाडाच्या सावलीत बसला आहात, ते झाड कुणीतरी खूप आधी लावले होते,” असे बफे सांगतात. गुंतवणूक ही वेळ मागते. मिडल क्लास अनेकदा पटकन पैसे कमावण्याच्या नादात दीर्घकालीन गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतो. बफेंचा सल्ला साधा आहे की खर्च झाल्यावर उरलेल्या पैशांतून गुंतवणूक करू नका; आधी गुंतवणूक करा आणि उरलेल्या पैशांतून खर्च भागवायला शिका. तात्पुरती सुखसोय भविष्यात महागात पडू शकते.
