दोन्ही पंतप्रधानांनी भारत-इस्रायल भागीदारीच्या सर्व पैलूंवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशांमधील दृढ विश्वास आणि मैत्रीचे प्रतिबिंब म्हणून, दोन्ही नेत्यांनी आपल्यातील द्विपक्षीय संबंध “शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी विशेष धोरणात्मक भागीदारी” पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. हितसंबंधांच्या वाढत्या अभिसरणाचे आणि सुरक्षित आणि समृद्ध भविष्याप्रति दोन्ही देशांच्या सामायिक दृष्टिकोनाचे हे प्रतीक आहे.
दोन्ही नेत्यांनी सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, अवकाश, ऊर्जा, महत्वपूर्ण तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, शिक्षण, वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात सहकार्य आणखी वाढवण्यावर सहमती दर्शवली. कृषी, जल व्यवस्थापन, स्टार्ट-अप, फिनटेक, डिजिटल आरोग्यसेवा, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत औषध निर्मिती क्षेत्रातील भारत-इस्रायल भागीदारीच्या परिवर्तनकारी क्षमतेवरही त्यांनी भर दिला. दोन्ही नेत्यांनी गतिशीलता भागीदारीचा विस्तार करण्याच्या नवीन उपक्रमांचे स्वागत केले, ज्यामुळे लोकांमधील परस्पर संबंधांना आणखी चालना मिळेल. प्रस्तावित मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करताना, त्यांनी नमूद केले की द्विपक्षीय गुंतवणूक करार, भारत-इस्रायल इनोव्हेशन ब्रिज, भारत-इस्रायल इनोव्हेशन सेंटर फॉर अॅग्रीकल्चर आणि भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास आणि नवोन्मेष निधी दोन्ही देशांमधील आर्थिक, उद्योजकीय आणि वैज्ञानिक सहकार्यात लक्षणीय वाढ करतील. त्यांनी एआय, सेमीकंडक्टर्स, क्वांटम आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे भारताचे प्रतिभावान मनुष्यबळ आणि इस्रायलच्या नवोन्मेषाचा समन्वय साधता येईल.
advertisement
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. पंतप्रधानांनी गाझा शांतता योजनेला आपला पाठिंबा दर्शवला आणि या उपक्रमामुळे प्रदेशात शांतता आणि स्थैर्य येईल अशी आशा व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी आयएमईसी आणि आय2यू2 उपक्रमांवर दोन्ही देशांमध्ये घनिष्ट सहकार्याचे आवाहन केले. त्यांनी दहशतवादाविरोधातील जागतिक लढा बळकट करण्याचा संकल्पही व्यक्त केला. दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्यात इस्रायलने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान नेतन्याहू यांचे आभार मानले.
