कामती खुर्द येथील शेतकरी गणेश गंगाराम गावडे यांनी एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांद्याची लागवड, खत आणि कांदा काढण्यासाठी महिला मजूर असा जवळपास 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च गंगाराम यांना आला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 60 पिशव्या कांदा विक्रीतून गंगाराम यांना 20 हजार रुपये मिळाले आहेत.
advertisement
तर शेतामध्ये आणखीन 60 पिशव्या कांदा शिल्लक आहे. एका एकरातून 120 पिशव्या कांदा निघूनही कांद्याला भाव मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 500 रुपये ते 1 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.
कांद्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय गंगाराम यांनी घेतला होता. पण कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने रोजंदारीवर येणाऱ्या महिलांना पगार देण्यासाठी पैसे देखील निघत नसल्यामुळे पुढे काय आशा करावी आणि काय स्वप्न पहावे, अशी खंत गणेश गावडे यांनी व्यक्त केली. सरकारने कांदा उत्पादन शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन कांद्याला योग्य तो हमीभाव द्यावा, अशी विनंती गणेश गावडे यांनी केली आहे.





