Cyclone Shakhti: पुढचे 72 तास टेन्शन वाढवणारे, ते आलंय....100 किमी वेगानं! अरबी समुद्रात घोंगावतंय सर्वात मोठं चक्रीवादळ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरबी समुद्रातील चक्रीवादळ Shakti मुळे IMD ने महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी, वादळी वारे आणि समुद्र खवळण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
1/8

यंदाचे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय झाले असून, त्याला श्रीलंकेने 'शक्ती' (Shakti) हे नाव दिले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या चक्रीवादळाबाबत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, किनारपट्टीवर १०० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसादरम्यान घराबाहेर न पडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
advertisement
2/8
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर, त्याचे रूपांतर खोल दाबाच्या क्षेत्रात झाले आणि शुक्रवारी (सकाळ ११:३० पर्यंत) त्याने चक्रीवादळाचे रूप घेतले. हे चक्रीवादळ सध्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या वादळाचा व्यापक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
3/8
भारतीय हवामान विभागाने चक्रावादळ 'शक्ती' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील किनारपट्टीचे आणि अंतर्गत भागांसाठी अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका आहे. या इशाऱ्यामुळे राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सक्रिय केली असून, संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
4/8
IMD च्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा हा अलर्ट ७ ऑक्टोबरपर्यंत लागू राहील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सध्या उच्च ते मध्यम श्रेणीच्या अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ३ ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात ४५-५५ किमी प्रति तास वेगाने वारे नोंदवले गेले होते, त्याची गती आता १०० किमी प्रति तासापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/8
चक्रीवादळामुळे समुद्रातील स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा कठोर इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. उंच लाटा आणि वेगवान सागरी प्रवाह जीवानिशी धोकादायक ठरू शकतात.
advertisement
6/8
तसेच, किनारी भागातील आणि सखल भागातील रहिवाशांना भरती आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. किनारी भागांसोबतच हवामान विभागाने विदर्भाच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण विभागात सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून, यामुळे जनजीवन विस्कळीत होणे, रस्त्यांवर अडथळे निर्माण होणे आणि पिकांचे नुकसान होणे अपेक्षित आहे.
advertisement
7/8
IMD च्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासोबतच, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांत नागरिकांना हलवण्याची तयारी पूर्ण ठेवण्याचे आणि जनतेपर्यंत वेळोवेळी आवश्यक माहिती पोहोचवण्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रात असलेल्या सर्व नौकांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
advertisement
8/8
हवामान तज्ज्ञांच्या मते, मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये या चक्रीवादळामुळे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे वाहतूक सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी वाढू शकतात. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि महानगरपालिकेच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. चक्रीवादळ 'शक्ती' ची नेमकी दिशा पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल; परंतु अधिकारी आणि नागरिकांनी या काळात पूर्ण तयारी आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Cyclone Shakhti: पुढचे 72 तास टेन्शन वाढवणारे, ते आलंय....100 किमी वेगानं! अरबी समुद्रात घोंगावतंय सर्वात मोठं चक्रीवादळ