‘मी माझ्या मूळ पक्षात परतलो’
प्रतिक्रिया देताना समरजीत घाटगे म्हणाले की, “मी माझ्या मूळ पक्षात परत आलो आहे. त्यामुळे कोणालाही अडचण होण्याचे कारण नाही.” त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे मतभेद संपल्याचेही स्पष्ट केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचं समन्वय दिसून आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यातील वाद मिटवला असून पुढेही आम्ही एकत्र काम करू,” असे त्यांनी सांगितले.
advertisement
पक्षप्रवेशाची प्रक्रिया आधीपासून सुरू
घाटगे यांनी सांगितले की, त्यांचा भाजप प्रवेश काही दिवसांपासून प्रलंबित होता. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त
घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विशेष भावना व्यक्त केल्या. “ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. पक्षाबाहेर असतानाही मी त्यांच्या नावाचा उल्लेख करत होतो. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले.
शरद पवारांना माहिती देऊनच निर्णय
भाजपमध्ये पुनर्प्रवेश करण्यापूर्वी आपण शरद पवार यांची भेट घेतली होती, असे घाटगे यांनी स्पष्ट केले. “डिसेंबरमध्येच मी त्यांना माझी भूमिका सांगितली होती. त्यांच्या माहितीनंतरच मी पुढील निर्णय घेतला,” असे त्यांनी नमूद केले.
कागलमध्ये ऐतिहासिक विजय
नगरपालिका निवडणुकीदरम्यान हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आले होते. या आघाडीने कागल नगरपरिषदेत 23 पैकी 23 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. नगराध्यक्षपदी सविता माने यांची निवड झाली. या निकालामुळे घाटगे-मुश्रीफ आघाडीला मतदारांचा ठाम पाठिंबा मिळाल्याची चर्चा रंगली होती. अशातच आज अखेर घाटगे यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे.
