पुणे : मालेगावच्या उपमहापौरांनी टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद पेटला होता. पण या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. टिपू सुलतान याांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने सपकाळ यांच्याविरोधात आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे. कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवलं' असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यााच्या विरोधात भाजपने तीव्र संताप व्यक्त केला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे पर्वती पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. घाटे यांच्या तक्रारीची दखल घेतल पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. विरोधक आणि हिंदू संघटनांनी यााबद्दल तीव्र आक्षेप घेत आंदोलन केलं. दोन दिवस चाललेल्या वादानंतर अखेरीस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून प्रशासनाने फोटो काढण्याचा निर्णय घेतला. मालेगाव पालिकेतला वाद निवळला.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
पण, या वादावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांच्या फोटो लावण्याचे समर्थन केलं. "ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवलं. रयतेला स्वराज्याचा विचार दिला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे आणि देशासाठी लढणारे भूमिपुत्र होते. त्यांनी कोणत्याही विषारी विचारांना जवळ केलं नाही. त्यामुळे शौर्याच्या दृष्टीने त्यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे' असं वक्तव्य सपकाळांनी केलं.
सपकाळांना लाज वाटली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला. "छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
