कोल्हापूर-पुणे प्रवास होणार सुसाट
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या देखरेखीखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर या मार्गावरील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोल्हापूर पेठ नाका ते सातारा आणि सातारा ते पुणे या दरम्यान चौपदरी आणि सहापदरीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच ब्लॅक स्पॉटवरील सुधारणा वेगाने सुरू आहेत. जून 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
advertisement
प्रवासाचा वेळ कितीने कमी होणार?
सध्या कोल्हापूर-पुणे प्रवासाला सुमारे 4 ते 4.5 तास लागतात. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. विशेषतहा खेड शिवापूर, शिवरे, हरिश्चंद्री आणि वेळे येथील धोकादायक ठिकाणांवर सुधारणा करण्यात येत आहेत.
खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम पूर्ण झाले असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. पेठ नाका ते कराड या 27 किमी रस्त्याचे काम अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडून सुरू असून कराड उड्डाणपूल जूनपर्यंत खुला होणार आहे. तसेच पेठ नाका-कोल्हापूर 45 किमी मार्गाचे काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडकडून सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकली यांच्या हस्तक्षेपानंतर कामांना गती मिळाली आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी अतिरिक्त भुयारी मार्ग मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
