नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी फिर्यादी राहुल गायकवाड आणि त्यांच्या मित्रांना आरोपींनी "वस्तीत का फिरता?" असे विचारून वाद घातला होता. हाच राग मनात धरून १९ मार्चच्या रात्री साडेदहाच्या सुमारास तेजस कांबळे आणि त्याच्या ६ साथीदारांनी राहुल यांच्या घरावर हल्ला चढवला. हातात लोखंडी हत्यारे घेऊन आलेल्या या टोळक्याने घरातील गॅस शेगडी, पाण्याची भांडी आणि दरवाजाची तोडफोड केली. इतकेच नव्हे, तर खिडकीतून सिमेंटचा ब्लॉक फेकून मारत राहुल यांच्या पालकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
कोथरूड पोलिसांची कारवाई
सोसायटीमध्ये दहशत माजवत या टोळक्याने इतर दोन नागरिकांनाही जखमी केले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत मुख्य आरोपी तेजस कांबळे (२४), अजय महाजन (२२), नीरज सातपुते (२०), नदीम शेख (१९), अभिजित ओव्हाळ (३०), सनी सानक्य (२०) आणि अभी घारे (२०) या सातही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
या सर्व आरोपींविरुद्ध 'आर्म ॲक्ट' आणि मारहाणीचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गुंडांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
