बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घडली. बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोम्बे ही साडेपाच वर्षीय चिमुकली ठार झाली. या घटनेमुळे मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असून या चिमुकलीचे वडील आणि आजी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
advertisement
आजोबांनी धाव घेतली अन्...
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरामागील शेतात जेसीबी चे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या चार फुट उंचीच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून ऊसात शिरला. आजोबा अरूण देवराम यांनी दोनशे फुटांवरून हे पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले. तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.
आई आणि आजोबांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
मी घरीच होते. बाबा पळत आले, मी मोठ्या पोराला घेऊन पळत गेले. तोवर ते घेऊन आले होते. बाबांनी ओढून काढलं. रक्तबंबाळ झालं होतं. रुग्णालयात दाखल केलं हे बोलताना त्या आईचे शब्दही फुटत नव्हते. आई नुसती ढसाढसा रडत होती. मुलीची अवस्था पाहून अक्षरश: आईनं टाहो फोडला. आपल्या मुलीला असं रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं, बिबट्याच्या तावडीतून त्या आईची अवस्था खूप बिकट झाली होती.
बिबळ्याच्या जबड्यातून कसं सोडवलं सांगितला थरारक घटनाक्रम
आमच्या जेसीबी चालू होता. ती पोर पाण्याची बाटली घेऊन येत होती. समोर ऊसातून येऊन बिबट्याने झडप घातली. ते पाहताच क्षणी आम्हीही चिमुकलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्याने धरलं खाली दाबलं अन् तो फरफटत उसात घेऊन गेला. ही घटना साडे नऊच्या आसपास १२ ऑक्टोबर रोजी घडली. आम्ही तिला वाचवण्यासाठी त्याच्या बोकांडी उडी मारली. आरडाओरडा केल्यानंतर मग त्याने तिला सोडलं. मात्र तोपर्यंत ती पुरती घायाळ झाली होती, खूप रक्तस्राव होत होता. या भागात बिबट्याचे हल्ले सारखे होत असतात. याआधी कुत्र्याची पिल्लही पळवली आहेत असं त्यांनी सांगितलं.
मागच्या दोन वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार लोकांनी जीव गमावल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या बिबट्याचा बंदोबस्त तातडीनं करावा अशी मागणी केली आहे. घराबाहेर असलेल्या ओट्यावर बिबट्याने हल्ला केला. आई वडील आणि आजोबांनी तिला बिबट्याच्या जबड्यातून वाचवलं, मात्र रक्तबंबाळ झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिने आपला जीव सोडला. डॉक्टरांनी हात लावण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे.