प्रशासनाच्या 'सौजन्याने' उपासमार!
वाहन चालक, लहान मुले, वृद्ध आणि महिला... हजारो प्रवासी रस्ते आणि बोगद्यांमध्ये अडकले होते. महामार्गावर जवळपास एकही हॉटेल किंवा दुकान नसल्याने अनेकांना सलग १०-१२ तास पोटात अन्नाचा कणही घेता आला नाही. "आम्ही हतबल होऊन रस्त्यावर बसलो होतो, पण साधी पिण्याच्या पाण्याची सोयही प्रशासनाकडून झाली नाही," अशा शब्दांत प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.
advertisement
माणुसकी विसरून 'लूटमार'
एकीकडे प्रवाशांच्या डोळ्यात पाणी होते, तर दुसरीकडे काही संधीसाधू विक्रेते त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत होते. कोंडीत अडकलेल्या भुकेल्या प्रवाशांना १५ रुपयांचा वडापाव ३० रुपयांना, २० रुपयांची पाण्याची बाटली ४० रुपयांना, तर १० रुपयांचा बिस्किटाचा पुडा १५ ते २० रुपयांना विकला जात होता. भूक मोठी की पैसा? या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी एक्सप्रेसवेवर 'पैसा' असंच मिळालं.
आयआरबीची 'टोल वसुली' सुरूच!
आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे, वाहनांच्या रांगा ३० ते ४० किलोमीटरपर्यंत गेलेल्या असतानाही आयआरबीने (IRB) टोल वसुली थांबवली नव्हती. प्रवाशांना रस्त्यात कोणतीही सुविधा देता आली नाही, पण टोल नाक्यावर मात्र त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसूल केले जात होते.
महामार्गावर ना खाण्यापिण्याची सोय, ना स्वच्छतागृह. अशा परिस्थितीत तिथे 27 तास अडकलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल, याचा विचारही प्रचंड भयंकर आहे.
