या नव्या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेमुळे माळशेज घाट ते थेट लोणावळ्यातील बोरघाट या ७० ते ८० किलोमीटरच्या पट्ट्यात दुसरा कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नाही. सध्या जेएनपीटी बंदर आणि मुंबई महानगर क्षेत्रातून (MMR) पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि थेट दक्षिण भारताकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक केवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अवलंबून आहे. यामुळे एखाद्या अपघातामुळेही संपूर्ण महामार्ग ठप्प होतो.
advertisement
प्रस्तावित उरण-कर्जत-शिरूर महामार्ग तयार झाल्यास ही अवजड वाहतूक आणि कंटेनर थेट पर्यायी मार्गाने वळवता येतील. यामुळे लोणावळा आणि खंडाळा घाटातील ५० टक्क्यांहून अधिक ट्रॅफिक कमी होईल. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक आमदारांनी हा प्रश्न लावून धरला होता. या प्रकल्पासाठी १२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, यामुळे केवळ मुंबई-पुणे अंतरच कमी होणार नाही, तर भविष्यातील मोठी वाहतूक कोंडी कायमची टाळता येईल.
