काय आहे नेमकी घटना?
मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा (वय ९, रा. उत्तरप्रदेश) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा (वय २२, रा. तळवडे) आहे. राधाने आपल्या गरोदरपणामुळे मदतीसाठी दोन महिन्यांपूर्वीच लहान बहीण सुधाला गावाकडून बोलावून घेतले होते. राधा आणि तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी दुपारी राधा जेवण करून सुधाला सोबत घेऊन पायी कामावर परतत होती. रस्ता ओलांडत असताना पीएमपीएमएलच्या एमएच. १२, एसएफ. ४४०३ क्रमांकाच्या ई-बसने त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत सुधाचा जागीच मृत्यू झाला, तर राधा गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जखमी महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
advertisement
पिंपरीतील चौकात रस्त्यातच उभी होती कार; ना चालक, ना नंबरप्लेट, उडाला गोंधळ, शेवटी डिकीमध्ये...
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करत तीव्र संताप व्यक्त केला. देहूरोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. पोलिसांनी बस चालक किरण भटू पाटील (वय ३५, रा. चिखली) याला ताब्यात घेतले असून, अपघाताची नोंद केली आहे. या गोंधळामुळे तळवडे-निगडी मार्गावरील बससेवा काही काळ थांबवावी लागली. ज्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
काही दिवसांपूर्वीच हिंजवडी येथे एका खासगी बसने चिरडल्याने तीन भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तळवडे येथे झालेला हा अपघात पीएमपीएमएल चालकांच्या बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतो. बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, अपघातांची ही मालिका कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
