नेमकी घटना काय?
फिर्यादी अनघा सागर सुरवसे (वय २९, रा. इंद्रायणी पार्क, आळंदी) यांचा विवाह सागर सुरवसे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. घरातील कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.
अनघा या गरोदर असतानाही सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर दया माया दाखवली नाही. पैशांच्या मागणीसाठी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. "पैसे आणले तरच घरात घेऊ, नाहीतर नांदवणार नाही," असा पवित्रा सासरच्यांनी घेतल्याने अखेर पीडितेने आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
advertisement
अनघा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी सागर अनिल सुरवसे (पती, वय ३०),अनिल प्रेमनाथ सुरवसे (सासरे, वय ६०), मंगल अनिल सुरवसे (सासू, वय ४९), भाग्यश्री आतिश गोतारणे (नणंद, वय ३२) यांच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, गरोदर महिलेवरील या अत्याचारामुळे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
