कसा रचला जातो सापळा?
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आहे. सोमेश्वरवाडी चौकाच्या परिसरात ही गँग सक्रिय असून, दुकानातील ३-४ जण १०० ते २०० मीटर अंतरावर उभे असतात. एखादे वाहन जात असताना पाठीमागून दुचाकीवर येऊन 'तुमच्या गाडीची हवा कमी आहे' किंवा 'गाडी पंक्चर आहे' असे सांगून वाहनचालकाचे लक्ष विचलित केले जाते. घाबरलेला चालक जवळच्याच पंक्चर दुकानात थांबतो आणि तिथेच लुटीचा खरा खेळ सुरू होतो.
advertisement
बनावट पंक्चरचा 'धंदा'
दुकानात गेल्यानंतर चालक बाजूला बघत असताना टोळीतील सदस्य मुद्दाम टोचणी मारून चाक पंक्चर करतात. त्यानंतर 'चाक पूर्ण खराब झाले आहे', 'टायरला एकामागोमाग चार पंक्चर आहेत' अशी भीती घातली जाते. एका पंक्चरसाठी ८० ते १०० रुपये आकारले जातात. एवढ्यावरच न थांबता, 'टायरमध्ये केमिकल टाकले नाही तर ट्यूब बदलावी लागेल' असे सांगून हजारो रुपयांचे बिल फाडले जाते.
पोलिसांनाही सोडलं नाही!
काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी खडकी आणि येरवडा भागात अशा टोळ्यांवर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली होती. मात्र, आता बाणेर परिसरात या टोळ्यांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. जाब विचारल्यास ही टोळी संघटितपणे अंगावर धावून येते किंवा मारहाणीची भीती दाखवते, ज्यामुळे नागरिक तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.
