काय म्हणाली तरुणीची आई?
गेल्या बारा वर्षांपासून आमची मुलगी मानसिक दबावाखाली होती. तिला वडील नाहीत, लहान भाऊ आहे. अशा परिस्थितीत आम्ही तिला मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. मात्र आता ती आमच्याकडे बघतही नाही. जर आमची मुलगी आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही इथेच आत्महत्या करू, असा इशारा तरुणीच्या आईने दिला आहे.
advertisement
आम्ही तिच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. वडिलांच्या निधनानंतर तिच्यावर कोणचीही वाईट नजर पडू नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले. मात्र काही व्यक्तींकडून तिच्यावर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकण्यात येत असल्याचा आमचा संशय आहे, असं तरुणीच्या आईने म्हटलं आहे. तर दुसरीकडे तरुणीने आज प्रतिज्ञापत्र जमा केलं, त्यात आपल्या आईने केलेली तक्रार खोटी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट पहायला मिळतोय.
तरुणीने काय काय म्हटलंय?
माझी आई आणि माझ्या भावाने केलेली तक्रार खोटी असून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली नव्हती. शिवाय त्यांच्यावर काठीने हल्ला देखील करण्यात आला नाही, असा खुलासा संबंधित तरुणीने केला आहे. ज्या तरुणावर तिच्या अपहरणाचा आरोप आहे, तो तरुण मागील एक वर्षापासून तिच्या संपर्कात होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं.
दरम्यान, तरुणीने याची कल्पना आपल्या आईला आणि दोन्ही भावांना देखील दिली होती. मात्र घरातून दोघांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिचा विवाह अन्य एका तरुणाशी जुळवला होता. २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह होणार होता. या लग्नाला तरुणीचा विरोध होता. तरीही घरच्यांनी तिच्या इच्छेविरोधात हा विवाह ठरवला होता. यामुळेच तरुणीने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
