नेमका थरार काय घडला?
गुरुवारी (५ फेब्रुवारी) दुपारी केशरी साहू धावडे वस्तीतील एका इमारतीवर चढला. तो उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरवण्यासाठी बराच वेळ विनवण्या केल्या. यावेळी साहूने आपल्या पत्नीशी बोलण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी त्याचे पत्नीसोबत फोनवर बोलणेही करून दिले, मात्र त्यानंतर काही क्षणांतच त्याने इमारतीवरून खाली झेप घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
व्हायरल केलेल्या सुसाईड नोटमध्ये साहूने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. "माझी पत्नी बेपत्ता असून तिला पळवून नेणाऱ्यांकडे चौकशी करा, सीसीटीव्ही फुटेज तपासा, अशी मागणी मी वारंवार पोलिसांकडे केली होती. मात्र मला पुरेशी मदत मिळाली नाही," असे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे.
साहूने आपल्या चिठ्ठीत मुलीच्या भवितव्याबद्दल आणि अंत्यविधीबद्दलही लिहिले आहे. "माझी बायको कुठेही राहू शकत नाही, ती परत येईल. माझ्या मृत्यूनंतर मला दफन करा किंवा अंत्यविधी करायचे असल्यास ते माझ्या मुलीच्या हातून करा," असे भावनिक शब्द त्याने लिहिले आहेत.
या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
