या महामार्गाचा पहिला टप्पा खराडी जंक्शन ते शिरूर बायपास दरम्यान सुमारे 53.4 किमीचा एलिव्हेटेड सहा लेन मार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे. दुसरा टप्पा शिरूर बायपास ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान सुमारे 192.5 किमी लांबीचा नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग असेल. शिरूर ते खराडी प्रकल्पासाठी वेल्सपण इंटरप्रायझेसला एल-वन बोलीदार म्हणून काम देण्यात आले असून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
advertisement
प्रवाशांसाठी खुशखबर, होळीमध्ये गावी जाण्यासाठी पुण्यातून अतिरिक्त ट्रेनची सोय, चेक करा वेळापत्रक
शिरूर–छत्रपती संभाजीनगर दरम्यान चार टोल नाके प्रस्तावित आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान विद्यमान रस्त्याच्या नूतनीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. खेड–शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणारा हा मार्ग पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल.
या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा एमआयडीसी तसेच बीड आणि जालना या औद्योगिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांतील अंतर कमी होऊन औद्योगिक मालवाहतूक सुलभ होईल व आर्थिक विकासाला चालना मिळेल.
भारतमाला फेज-2 अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून बीओटी तत्वावर उभारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी या महामार्गाची घोषणा केली होती. प्रारंभी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे होता. मात्र, अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे.
सध्या भूसंपादन प्रक्रिया संबंधित महसूल विभागामार्फत वेगाने सुरू आहे. हा महामार्ग हवेली, भोर, दौंड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांतून जाणार असल्याने स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे.






