मैत्रीचा 'रक्तरंजित' शेवट
आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. नऱ्हे) आणि चेतन बाजीराव चव्हाण (वय २३, रा. धनकवडी) हे दोघेही चांगले मित्र होते. या दोघांचीही एकाच तरुणीशी मैत्री होती. मंगळवारी रात्री हे दोघे त्रिमूर्ती चौकात भेटले. गप्पांच्या ओघात आदित्यने त्या तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधल्याचे चेतनला समजले. रागाच्या भरात असलेल्या चेतनने कशाचाही विचार न करता भरचौकात कोयता उपसून आदित्यवर हल्ला चढवला.
advertisement
भरचौकात रक्ताचा सडा
रात्रीची वेळ आणि लोकांची वर्दळ असतानाही आरोपी चेतनने आदित्यवर जीवघेणे वार केले. या हल्ल्यात २० वर्षांचा आदित्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अवघ्या काही सेकंदात मित्राचे रूपांतर शत्रूत झाले आणि जुन्या मैत्रीचा शेवट रक्ताने झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आरोपीला बेड्या
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी चेतन चव्हाण याला अटक केली आहे. आदित्य कांबळे याच्या फिर्यादीवरून चेतनविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी आदित्यवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात किरकोळ वादातून कोयता काढण्याच्या वाढत्या घटनांनी आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
