नेमकी फसवणूक कशी झाली?
हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तक्रारदार महिला आणि आरोपींची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपींनी या महिलेला आणि त्यांच्या पतीला "सोन्याचे दर सध्या कमी आहेत, लवकरच ते वाढणार आहेत. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल," असे सांगून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.
advertisement
आरोपींनी मोबाइलवर सोन्याच्या दागिन्यांची आणि बिस्किटांची छायाचित्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम उकळली. सुरुवातीला काही प्रमाणात सोने आणि परतावा देऊन विश्वास निर्माण केला, मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम आणि सोन्याचे बिस्किट देण्यास टाळाटाळ केली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ महिलेने पोलिसांत धाव घेतली.
या दाम्पत्याने एकूण १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत. आर्थिक गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पडण्यापूर्वी त्या योजनेची आणि व्यक्तीची पूर्ण शहानिशा करणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.
