नेमकी घटना काय?
शालन वायला या गेल्या १० वर्षांपासून जयश्री जगदाळे यांच्या घरी कचरा संकलनाचे काम करत आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला आणि त्यानंतर त्या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बसल्या. कचरा बाजूला काढत असताना त्यांना अचानक एक सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी सुमारे १० ग्रॅम (एक तोळा) वजनाची होती.
advertisement
कचऱ्यात कशी गेली अंगठी?
ही अंगठी जयश्री जगदाळे यांची सून प्रियांका जगदाळे यांची होती. सकाळी मुलाचा टिफिन भरण्याच्या घाईगडबडीत प्रियांका यांनी आपली अंगठी काढून एका कागदात गुंडाळून ठेवली होती. मात्र, कामाच्या व्यापात त्या अंगठीचा विसर पडला आणि तो कागद चुकून कचऱ्याच्या डब्यात गेला. आपली मौल्यवान अंगठी हरवल्याचे लक्षात आल्यावर जगदाळे कुटुंबीय चिंतेत होते.
अंगठी सापडताच शालन वायला यांनी कोणतीही लालसा न बाळगता तातडीने जगदाळे कुटुंबियांशी संपर्क साधला आणि ती त्यांच्या स्वाधीन केली. आपली लग्नाची आठवण असलेली अंगठी सुखरूप परत मिळाल्याने प्रियांका जगदाळे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जगदाळे कुटुंबियांनी शालन यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.'स्वच्छ' संस्थेच्या वतीनेही त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.
