नियमांच्या उल्लंघनात मोठी वाढ
मॉडर्न महाविद्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा कार्यशाळेत पाटील बोलत होते. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये पुण्यात नियम उल्लंघनाप्रकरणी ८ ते ९ लाख चलन काढण्यात आले होते, जे २०२४ मध्ये तब्बल २२ लाखांपर्यंत पोहोचले आहे. रस्ते अपघातात देशात दरवर्षी १ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू होतो, ज्यात २० ते ४० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. पुण्यात रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण २७० वरून २२३ पर्यंत कमी झाले असले, तरी हे प्रमाण जागतिक सरासरीच्या तुलनेत अजूनही जास्त आहे.
advertisement
पीटीपी ॲपमुळे बसला शिस्तीचा बडगा
ॲपच्या प्रभावाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, "सुरुवातीला एका महिन्यात ३६०० तक्रारी येत होत्या, मात्र आता एका दिवसात २४०० तक्रारी येत आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या १ लाख ८० हजार तक्रारींपैकी १ लाख ३० हजार प्रकरणांमध्ये वाहनचालकांना चलन बजावण्यात आले आहे." या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये एक प्रकारची 'अदृश्य भीती' निर्माण झाली असून, पुणेकरच आता एकमेकांच्या तक्रारी नोंदवून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम करत आहेत.
विद्यार्थ्यांना हेल्मेटचे आवाहन
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी महाविद्यालयीन स्तरावर रस्ते सुरक्षेबाबत जागृती करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरणे, परवाना जवळ ठेवणे आणि ट्रिपल सीट प्रवास टाळणे या गोष्टी नैतिकतेने पाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
