काही दिवसांपूर्वी बेदरकारपणे चालवल्या जाणाऱ्या मिक्सर ट्रकच्या धडकेत अकरा वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे या निरपराध मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मिक्सर ट्रकचा चालक, मालक आणि सुपरवायझर यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तथापि,प्रत्युषाच्या आई-वडिलांनी याबाबत अधिक काटेकोर कारवाईची मागणी करत संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधातही गुन्हा दाखल करण्याची आणि दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारी (22 ऑगस्ट) हिंजवडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
advertisement
हिंजवडी परिसरात नेहमीच अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. बेदरकार वाहतूक, विशेषतहा मिक्सर ट्रक आणि इतर भारी वाहने, नागरिकांसाठी धोका निर्माण करत आहेत. यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे आणि या बेदरकारपणाचा बळी प्रत्युषा ठरली. घटनेनंतर स्थानिक नागरिक अजूनही शोक व्यक्त करत आहेत आणि या परिसरातील वाहतूक समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
अपघातात बळी गेलेल्या प्रत्युषाच्या आई-वडिलांनी हातात फलक घेऊन घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करावा,अशी ठाम मागणी केली. याप्रसंगी नागरिकांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला. घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी सकाळी आठ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.मात्र,नागरिकांच्या मते, ही कारवाई खूप उशिरा सुरू झाली आहे आणि त्याचा परिणाम तात्काळ दिसत नाही.
स्थानिक नागरिक, विशेषत पालक, या दुर्घटनांमुळे चिंतेत आहेत.ते म्हणतात की, अवजड वाहनांचे नियमन आणि दिवसा वाहतुकीवर बंदी हा एकच उपाय आहे, अन्यथा अजून बळी घ्यावे लागतील. ही घटना केवळ प्रत्युषा कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंजवडी परिसरासाठी धक्कादायक ठरली आहे. नागरिक आता प्रशासनाकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा करत आहेत, ज्यामुळे भविष्यात अशा दुर्दैवी अपघातांना रोखता येईल.
या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि हेच कारण आहे की हिंजवडी परिसरात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालणे हा विषय गरज म्हणून समोर आला आहे.
