किंक्रांत म्हणजे काय आणि तो अशुभ का मानला जातो?
पौराणिक कथेनुसार, संक्रांती देवीने संक्रासुराचा वध केल्यानंतरही 'किंकरासूर' नावाचा एक मायावी राक्षस शिल्लक होता. हा राक्षस लोकांना प्रचंड त्रास देत असे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने 'किंक्रांत' हे रूप धारण करून या राक्षसाचा संहार केला. देवीने राक्षसाचा वध केला असला, तरी हा काळ अत्यंत संघर्षाचा आणि संहारक मानला जातो. ज्योतिषाच्या दृष्टीने हा काळ सूर्याच्या संक्रमणाशी संबंधित असतो. यावेळी वातावरणात संहारक लहरींचे प्राबल्य जास्त असते, म्हणून याला 'करिदिन' म्हटले जाते. या दिवशी कोणतेही नवीन शुभ कार्य, जसे की साखरपुडा, गृहप्रवेश किंवा मोठे व्यवहार करणे टाळले जाते.
advertisement
किंक्रांतीलाच 'बोरन्हाण' का करावे?
बोरन्हाण हा 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केला जाणारा एक कौतुक सोहळा आहे. किंक्रांतीला अशुभ मानले जात असतानाही बोरन्हाण करण्यामागे खालील दोन प्रमुख कारणे आहेत.
राक्षसाची 'वाईट दृष्टी' टाळण्यासाठी
असे मानले जाते की, किंकर किंवा करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी लहान मुलांवर पडू शकते. या राक्षसाच्या सावलीपासून मुलांचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांना 'बोरन्हाण' घातले जाते. मुलांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, हरभरे आणि चॉकलेट्स ओतून त्यांना या संकटापासून सुरक्षित ठेवण्याचे हे एक प्रतीक आहे.
ऋतू बदलाच्या बाधेपासून संरक्षण
मकर संक्रांतीनंतर हवामानात हळूहळू बदल होऊ लागतो. थंडी कमी होऊन ऊन वाढू लागते. लहान मुलांच्या शरीराला या बदलाची सवय नसते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. बोरन्हाणात वापरले जाणारे घटक (बोरं, ऊस, आवळा, हरभरे) हे सर्व सी-व्हिटॅमिन आणि उष्णता देणारे असतात. हे पदार्थ मुलांच्या अंगावरून ओतताना, मुले ते आनंदाने वेचतात आणि खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
