कामदा एकादशी: इच्छापूर्तीचा पावन काळ
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'कामदा एकादशी' म्हणतात. 'कामदा' म्हणजे इच्छा पूर्ण करणारी. ही हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची आराधना केल्याने केवळ पापांचा नाश होत नाही, तर गरिबी आणि दरिद्रतेपासूनही सुटका मिळते. ज्या व्यक्तींच्या प्रगतीत आर्थिक अडथळे येत आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस 'वरदान' ठरू शकतो.
advertisement
कर्जमुक्तीसाठी 'पिंपळाच्या झाडाचा' प्रभावी उपाय
जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल, तर कामदा एकादशीला हा उपाय अवश्य करा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान उरकून एका कलशात पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध आणि साखर मिसळा. हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. पाणी अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, असे मानले जाते. या उपायामुळे आर्थिक मार्ग मोकळे होतात आणि कर्जातून सुटका होण्यास मदत होते.
लक्ष्मी-नारायण पूजा आणि 'पिवळ्या' वस्तूंचे दान
भगवान विष्णूला 'पिवळा' रंग अत्यंत प्रिय आहे. आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करा. त्यांना पिवळी फुले आणि केळी अर्पण करा. गरजू व्यक्तीला पिवळे कपडे, चणा डाळ किंवा पिवळी फळे दान करा. ज्योतिषशास्त्रानुसार, दानामुळे कुंडलीतील 'गुरु' ग्रह बलवान होतो, जो धनाचा कारक आहे. यामुळे रखडलेला पैसा परत मिळण्याचे योग जुळून येतात आणि कर्जाचा भार हलका होतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
