सूतक काळ सुरू झाला
परंपरेनुसार सूतक हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो. त्यामुळे सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून सूतक लागू झाला आहे. धार्मिक श्रद्धा पाळणारे भाविक या काळात काही आचारसंहितेचे पालन करतात.
सूतक काळातील आचारसंहिता
धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात शक्यतो घरातच राहावे, देवतांचे नामस्मरण करावे आणि मानसिक जप करावा. अनेक कुटुंबांत अन्नपदार्थ झाकून ठेवणे, शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने टाकणे आणि मंदिरांचे दरवाजे बंद ठेवणे अशी पद्धत आहे.
advertisement
या काळात नवीन अन्न शिजवणे किंवा सेवन करणे टाळावे, अशी परंपरा सांगते. तसेच अनावश्यक वादविवाद, भांडणे, प्रवास किंवा महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत, असेही मानले जाते. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, अशी समजूत आहे.
ग्रहण संपल्यानंतर काय करावे?
चंद्रग्रहण समाप्त झाल्यानंतर त्वरित स्नान करणे आणि घरात स्वच्छता राखणे योग्य मानले जाते. काही जण गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडून वातावरण शुद्ध करण्याची प्रथा पाळतात. स्नानानंतर देवतांचे स्मरण करूनच दैनंदिन कामकाज सुरू करावे, असे धर्मग्रंथात नमूद आहे.
काय करू नये?
ग्रहण संपताच लगेच झोपणे, मोठे निर्णय घेणे किंवा वाद निर्माण करणे टाळावे, अशीही परंपरागत सूचना आहे. पूजा साहित्याला किंवा नैवेद्याला स्पर्श करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक मानले जाते.
(सदर बातमी फक्त माहितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
