भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सध्याचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपला कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाढवण्याची विनंती बीसीसीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे. 2023 पासून या पदावर कार्यरत असलेल्या आगरकर यांचा कार्यकाळ IPL 2025 पूर्वीच एका वर्षाने वाढवण्यात आला होता.
एका वृत्तानुसार आगरकर यांच्या या विनंतीवर बीसीसीआयने चर्चा केली असून अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. सध्या निवड समितीत अजित आगरकर यांच्यासोबत प्रज्ञान ओझा, आरपी सिंग, अजय रात्रा आणि शिवसुंदर दास यांचा समावेश आहे.
advertisement
आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. भारताने तीन आयसीसी किताब जिंकले असून त्यात सलग दोन टी20 वर्ल्ड कप आणि एक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. याशिवाय 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत उपविजेता ठरला होता.
मात्र याच काळात टीम इंडियाचा दारूण पराभव देखील झाल्याचे पाहायला मिळाले. भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ऐतिहासिक कसोटी मालिका पराभव पत्करावे लागला होता. तसेच भारत 2023-25 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.
आगरकर यांच्या कार्यकाळात संघात मोठा बदलही घडून आला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर रविचंद्रन अश्विन यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तसेच हार्दिक पांड्या यांना संभाव्य कर्णधार मानले जात असतानाही आगरकर यांनी धाडसी निर्णय घेत सूर्यकुमार यादव यांची टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या निर्णयाबाबत बोलताना आगरकर यांनी असा युक्तीवाद केला होती की, आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळू शकेल. आम्हाला वाटते की तो या भूमिकेसाठी योग्य उमेदवार आहे.
अलीकडेच भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी20 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजयासाठी आगरकरांचे कौतुक केले होते. आगरकर यांना अनेकदा टीका सहन करावी लागते, पण त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे हा किताब मी त्यांना समर्पित करतो, असे गंभीर यांनी म्हटले.
अजित आगरकर यांनी 1998 ते 2007 या कालावधीत भारतासाठी 26 कसोटी, 191 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले असून एकूण 349 विकेट्स घेतल्या आहेत.
