दरम्यान या अंतिम सामन्याबाबत पाकिस्तानमध्येही मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडूही या सामन्याबाबत वेगवेगळ्या भविष्यवाण्या करत आहेत. आपल्या आधीच्या अंदाजांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झालेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याने देखील या सामन्याबाबत पुन्हा एकदा भाकीत केले आहे.
Geo News च्या ‘हंसना मना है’ या शोमध्ये होस्ट तबिश हाश्मी यांनी अहमद शहजाद, रशीद लतीफ आणि मोहम्मद आमिर यांना विचारले की भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कोण जिंकेल?
advertisement
यावेळी होस्टने असेही सांगितले की या सामन्यासाठी मिश्र मातीची (हायब्रिड) पिच तयार केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर होस्टने विचारले की भारताने प्रथम गोलंदाजी केली किंवा प्रथम फलंदाजी केली तर कोणता संघ जिंकेल? यावर मोहम्मद आमिरने दोन्ही परिस्थितीत न्यूझीलंडच विजयी होईल, असे सांगितले. मात्र राशिद लतीफ आणि अहमद शहजाद यांनी एकमुखाने भारताच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला.
आपल्या अंदाजामागचे कारण सांगताना मोहम्मद आमिर म्हणाला की दोन्ही संघांची फलंदाजी जवळपास सारखीच आहे. मात्र न्यूझीलंडची गोलंदाजी अधिक मजबूत आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताकडून गोलंदाजीत सध्या फक्त जसप्रीत बुमराह चांगल्या लयीत असल्याचेही त्याने म्हटले.
दरम्यान याच शोच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मोहम्मद आमिरला पुन्हा विचारण्यात आले की वर्ल्ड कप कोण जिंकेल? त्यावर मात्र त्याने भारत विजेता होईल, असे उत्तर दिले.
विशेष म्हणजे मोहम्मद आमिर आपल्या आधीच्या भविष्यवाण्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाला आहे. त्याने याआधी भारतासाठी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे भाकीत केले होते. तसेच इंग्लंड विजेतेपद जिंकेल, असा अंदाजही व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी आमिरला ‘ढोंगी बाबा’ असेही संबोधले होते.
टीम इंडियाच्या विजयानंतर आमिर म्हणाला की इंग्लंड सामना जिंकू शकला असता, परंतु एका महत्त्वाच्या ड्रॉप कॅचमुळे त्यांना सामना गमवावा लागला. आमिरच्या मते जर हॅरी ब्रूकने संजू सॅमसनचा कॅच पकडला असता तर इंग्लंड लक्ष्य गाठू शकले असते.
