मागच्या वर्षी आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. यानंतर 4 जून 2025 ला बंगळुरूमध्ये टीमकडून जोरदार सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं, पण चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामन्यांच्या आयोजनावर बंदी घातली गेली.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या चेंगराचेंगरीनंतर मैदानाच्या सुरक्षेबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले होते. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने कर्नाटक सरकारकडे आयपीएलचे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवरच खेळवले जावे, यासाठी विनंती केली. सरकारने असोसिएशनची ही विनंती मान्य केली आहे, पण यासाठी सरकारने काही अटीदेखील ठेवल्या आहेत.
advertisement
आयपीएलचे आमचे सामने बंगळुरूमध्ये होतील, कारण चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा सामने आयोजित करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी अधिकृत प्रतिक्रिया आरसीबीने दिली आहे. परवानगी मिळाल्याबद्दल आरसीबीने कर्नाटक सरकार, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि कर्नाटक पोलिसांचेही आभार मानले आहेत.
आरसीबीची दोन होम ग्राऊंड
आरसीबी त्यांच्या 7 होम मॅचपैकी 5 मॅच चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे, तर त्यांच्या उरलेल्या 2 मॅच या रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात प्रत्येक टीम 7 मॅच त्यांच्या घरच्या मैदानात आणि 7 मॅच बाहेर खेळते.
