पंजाब किंग्सने दिलेल्या ब्रेकमुळे विकेट कीपर जितेश शर्मा याचं नाव प्रकाशझोतात आलं, एवढंच नाही तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजेही उघडले. जितेश शर्मा हा भारतीय क्रिकेटमध्ये नवा फिनिशर म्हणून उदयाला आला. आरसीबीला मागच्या मोसमात विजय मिळवून देताना जितेश शर्माची भूमिका महत्त्वाची ठरली, पण सगळ्यात आधी जितेशने पंजाब किंग्सकडून खेळताना लक्ष वेधून घेतलं.
advertisement
पंजाबने जितेशला सोडलं
जितेश शर्मा हा आयपीएलच्या 3 मोसमांमध्ये पंजाब किंग्ससोबत होता, तसंच शेवटच्या मोसमात तो टीमचा उपकर्णधारही झाला. पंजाबसाठी खेळताना जितेशने 40 सामन्यांमध्ये 730 रन केल्या. पंजाब किंग्ससोबतच्या आपल्या प्रवासाबद्दल आणि प्रीती झिंटाच्या नात्याबद्दलही जितेश शर्मा या मुलाखतीमध्ये बोलला आहे.
प्रीती झिंटाचा उल्लेख जितेश शर्माने मोठी बहीण असा केला आहे. प्रीतीसोबतचं आपलं नातं जिव्हाळ्याचं आणि आदराचं आहे. तसंच हे नातं फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित नाही, असंही जितेशने स्पष्ट केलं.
प्रीती झिंटाला पश्चाताप
'मी प्रीतीचा खूप आदर करतो. ती मला मेसेज आणि फोनही करते. मी तिला माझ्या मोठ्या बहिणीसारखी मानतो. मी हिमाचलचा आहे हे तिला कळालं, ती सुद्धा हिमाचलचीच आहे, त्यामुळे आम्ही तासनतास बोलायचो. अगदी सामान्य गप्पाही मारायचो, ती खूप गोड आहे', असं जितेश शर्मा म्हणाला.
'पंजाब किंग्ससोबत खेळण्याचा निर्णय महत्त्वाचा आणि गेम चेंजर ठरला. टीमने माझ्यावर सुरूवातीलाच विश्वास दाखवला, ही संधी माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. या संधीमुळेच माजी कारकीर्द घडवण्यात मदत केली. त्यावेळी माझ्यासाठी फक्त एकच टीमने बोली लावली, ती म्हणजे पंजाब किंग्स', असं जितेश शर्माने सांगितलं.
'पुढच्या लिलावात पंजाबने माझ्यासाठी 7 कोटींसाठी राईट टू मॅच कार्ड वापरलं, पण आरसीबीने 11 कोटी रुपयांची बोली लावली, त्यामुळे मी आरसीबीकडे गेलो. त्यानंतर प्रीती मॅडमनी मला फोन केला. मी तुला टीममध्ये घेऊ शके नाही, याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे, असं त्या मला म्हणाल्या. पण मला 11 कोटी रुपये मिळाल्यामुळे त्या खूप आनंदी होत्या. त्यांनी मला या पैशांची चांगली गुंतवणूक करायला सांगितली', अशी भावनिक आठवण जितेश शर्माने सांगितली.
