आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स नवीन मैदान शोधत असल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. बीसीसीआय याबद्दलचा अंतिम निर्णय घेणार आहे, पण त्याआधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपण राजस्थानच्या मॅच खेळवण्यासाठी तयार असल्याचं सांगावं लागणार आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्स व्यवस्थापन नव्या मैदानासाठी पर्याय शोधत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान रॉयल्सच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत प्राथमिक चर्चाही झाली आहे. स्टेडियम, हॉटेलचे पर्याय, विमानतळ आणि इतर लॉजिस्टिकचं मूल्यांकन करण्यासाठी राजस्थान रॉयल्सची टीम अलीकडेच पुण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सचे मागच्या हंगामात राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत (आरसीए) वाद झाले होते. आरसीएच्या एका अधिकाऱ्याने तर टीमवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. हा आरोप राजस्थान रॉयल्सने फेटाळून लावला आणि या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
advertisement
राजस्थान रॉयल्स आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील डील फायनल झालं आणि बीसीसीआयने परवानगी दिली, तर राजस्थान रॉयल्स त्यांचे किमान 4 सामने पुण्यात खेळेल, तर उरलेलेल 3 मॅच गुवाहाटीमध्ये खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातही राजस्थानने गुवाहाटीमध्ये काही सामने खेळले होते.
राजस्थान रॉयल्स टीम व्यवस्थापन स्टेडियमची क्षमता, मैदानातली खेळपट्टी आणि हॉटेल व्यवस्था जाणून घेण्यासाठी आले होते. एमसीए अध्यक्ष रोहित पवार आयपीएल पुण्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पुण्यामध्ये मागच्या 3 मोसमांपासून आयपीएलचं आयोजन करण्यात आलेलं नाही. 2022 मध्ये पुण्यात आयपीएलचा शेवटचा सामना खेळवला गेला होता. कोरोनामुळे तेव्हा संपूर्ण आयपीएल मुंबई आणि पुण्यातच खेळवली गेली होती.
आरसीबीकडूनही पुण्याची चाचपणी
दुसरीकडे आरसीबीही त्यांचे घरचे सामने पुण्यात खेळवण्यासाठी चाचपणी करत असल्याचं वृत्त आहे. आरसीबी आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचं आयोजन केलं गेलं होतं, पण या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले, यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवरचे आंतरराष्ट्रीय सामनेही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आरसीबीचे आयपीएल 2026 चे सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होतील का? याबाबत साशंकता आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच झाल्या नाहीत तर पर्याय म्हणून आरसीबी व्यवस्थापनही पुण्याच्या स्टेडियमचा होम ग्राऊंड म्हणून विचार करत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्यांना परवानगी नाकारणारे कर्नाटक राज्य सरकार आयपीएलच्या जवळ जाऊन आपली भूमिका बदलू शकते अशी शक्यता आहे.
एमसीएसमोर पेच
दरम्यान राजस्थान रॉयल्सने एमसीएला ईमेल पाठवून मंजुरी मागितली आहे, पण आरसीबीच्या प्रस्तावाची वाट पाहायची का? हा पेच एमसीएसमोर निर्माण झाला आहे. आरसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावापर्यंत वेळ मागितल्याचं सांगण्यात येत आहे.
