आयपीएलचं 2400 कोटी रुपयांचे नुकसान
ललित मोदी यांनी बीसीसीआयच्या (BCCI) सध्याच्या कारभारावर आणि लीगच्या फॉरमॅटवर जोरदार टीका केली आहे. आयपीएलमध्ये मूळ कराराप्रमाणे सामने न खेळवले गेल्यामुळे लीगचे सुमारे 2400 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा खळबळजनक दावा ललित मोदी यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी होत नसलेले 20 सामने कसे फ्रेंचायझींना तोट्याचे ठरतायेत, याविषयी माहिती दिली आहे.
advertisement
20 सामन्यांचा तोटा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन टीम्सची अंदाजे 31,000 कोटी रुपयांना विक्री झाल्याबद्दल ललित मोदींनी अपेक्षित असा आनंद व्यक्त केला. तर आयपीएलमधून बीसीसीआय चूक करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. बीसीसीआयच्या सध्याच्या पद्धतीमुळे प्रत्येक टीमला मोसमात 20 सामन्यांचा तोटा सहन करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
एकूण 94 सामने होणं अपेक्षित, पण...
आयपीएलमधील प्रत्येक टीमने एकमेकांविरुद्ध दोनदा (होम ग्राऊंड आणि बाहेरच्या ग्राऊंडवर) खेळणं अपेक्षित असतं. पण 2022 मध्ये जेव्हा टीम्सची संख्या 10 झाली, तेव्हा या फॉरमॅटनुसार लीग टप्प्यात 90 आणि बाद फेरीत 4 असे एकूण 94 सामने होणं अपेक्षित होते. मात्र, सध्या आयपीएल केवळ 74 सामन्यांचे आयोजन करत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर बीसीसीआयला रेव्हेन्यूचा तोटा होत असल्याचं ललित मोदी यांनी म्हटलं आहे.
अतिरिक्त 2400 कोटी रुपये मिळाले असते
आयपीएलच्या शेड्यूल कॅलेंडरमध्ये जागा नसेल तर टीम्सची संख्या वाढवू नका. होम आणि अवे फॉरमॅटमध्येच खरी व्हॅल्यू दडलेली आहे. जर खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी सामने कमी केले जात असतील, तर ते चुकीचं असल्याचं देखील ललित मोदी यांनी म्हटलं आहे. जर आज 94 सामने होम आणि अवे पद्धतीने खेळवले गेले असते, तर प्रति मॅच 118 कोटी रुपयांनुसार मीडिया राइट्समधून अतिरिक्त 2400 कोटी रुपये मिळाले असते, असंही मोदी यावेळी म्हणाले.
फ्रँचायझींचा 120 कोटींचा तोटा
दरम्यान, जर आयपीएलला अतिरिक्त 2400 कोटी रुपये मिळाले असते तर याचे 50 टक्के म्हणेज यातील 1200 कोटी रुपये सर्व 10 टीम्सना मिळाले असते, म्हणजेच प्रत्येक टीमला 120 कोटी रुपये जास्तीचे मिळाले असते. यामुळे साहजिकच टीम्सची व्हॅल्यू अजून वाढली असती, असं म्हणत ललित मोदी यांनी आयपीएलची बॅलेन्स शीटच दाखवून दिलीये. तर बीसीसीआयला आरसा दाखवला आहे.
