पाकिस्तानमध्ये संतापाची लाट
बांगलादेशविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पहायला मिळतंय. माजी विकेटकीपर-बॅट्समन कामरान अकमलने अत्यंत तिखट शब्दांत आपल्याच टीमवर टीका केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटचा दर्जा इतका घसरला आहे की, आता नेदरलँडसारख्या टीम्सही पाकिस्तानसोबत खेळून आपल्याला 'टेस्ट नेशन'चा दर्जा मिळावा, असा विचार करत असतील, अशा शब्दांत अकमलने आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याचा पारा चांगलाच चढला होता.
advertisement
आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणायची का?
तिसऱ्या वनडेमधील निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अकमल म्हणाला की, बॅटिंगसाठी पोषक खेळपट्टी असतानाही पाकिस्तानने आधी बॅटिंग का केली नाही? बांगलादेशने 290 धावा केल्या, पण लिटन दास संथ खेळला नसता तर हा आकडा 350 च्या पार गेला असता. "जर तुम्ही जिंकणार नसाल, तर काय आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणायची आहे का? ती खेळून जिंकावी लागते.", अशा शब्दात त्याने स्वत:च्या क्रिकेट टीमवर निशाणा साधला आहे.
ही खरी चिंतेची बाब - कामरान अकमल
पाकिस्तानमधील एका खाजगी वाहिनीवर बोलताना कामरान अकमल म्हणाला, आपल्या क्रिकेटची अवस्था काय करून ठेवली आहे? मला तर वाटतं की नेदरलँडची टीम आता विचार करत असेल की पाकिस्तानसोबत 3 मॅचची सिरीज खेळूया, म्हणजे आम्हाला टेस्ट नेशनचा दर्जा मिळेल. तुम्ही क्रिकेटचा खेळ मांडला आहे. मॅच हरल्यानंतर कोणालाही याचे गांभीर्य वाटत नाही, ही खरी चिंतेची बाब आहे, असंही कामरान अकमल म्हणाला आहे.
