सामना रद्द झाला तर विजेता कोण?
टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेची फायनल असल्यामुळे आयसीसी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे या मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर मॅच 8 मार्चला सुरू होऊ शकली नाही, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला फायनल खेळवली जाईल. तसंच सामना 8 मार्चला सुरू झाला आणि पण मध्येच थांबला तर 9 मार्चला जिथे सामना थांबला तिथपासून पुढे खेळवला जाईल.
advertisement
फायनलसाठी आयसीसीने 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळही दिला आहे, त्यामुळे अशीच परिस्थिती ओढावली तर कमी ओव्हरचा खेळ करून त्याच दिवशी मॅचचा निकाल लावला जाईल. मॅचचा निकाल लावण्यासाठी दोन्ही टीमना कमीत कमी 10 ओव्हर तरी खेळाव्या लागणार आहेत.
पण दोन्ही दिवशी म्हणजेच 8 आणि 9 मार्चला मॅच खेळणं शक्य झालं नाही तर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही टीमना विजयी घोषित केलं जाईल. म्हणजेच वर्ल्ड कपची फायनल रद्द झाली तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्तरित्या चॅम्पियन म्हणून घोषित केलं जाईल. क्रिकेट इतिहासात ही परिस्थिती दुर्मिळ आहे, पण टीम इंडियासोबत असं घडलं आहे, जेव्हा 2003 साली टीम इंडिया आणि श्रीलंकेला चॅम्पियन्स ट्रॉफीचं संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं, कारण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नव्हता.
टीम इंडिया लागोपाठ दुसऱ्यांदा चॅम्पियन?
याआधी 2024 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही टीम इंडियाचा विजय झाला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याही टीमला लागोपाठ दोन वेळा ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे रविवारच्या फायनलमध्ये विजय झाला तर टीम इंडिया नवा इतिहास घडवेल. दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने कधीच न्यूझीलंडचा पराभव केलेला नाही.
