या सामन्यात भारताने टीममध्ये दोन बदल केले होते. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला आणि रिंकू सिंगच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाली. या दोन बदलांमुळे टीम इंडियाला त्यांच्या बॅटिंग क्रमवारीमध्येही बदल करावे लागले. संजू सॅमसन हा ओपनिंगला आला तर इशान किशन तिसऱ्या आणि तिलक वर्मा सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला.
ओपनिंगला आलेल्या संजू सॅमसनने 15 बॉलमध्ये 24 रन केले, ज्यात दोन सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. रिंकूच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये बॅटिंगला आलेल्या संजूने बॅटिंगची सुरूवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
संजू सॅमसनने दुसऱ्या बॉलवर सिक्स मारून शानदार सुरुवात केली. पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीवर हल्ला केला आणि एका ओव्हरमध्ये 10 रन केल्या. संजू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण पुन्हा एकदा त्याला चांगल्या सुरूवातीचं रुपांतर मोठ्या खेळीमध्ये करता आलं नाही. चौथ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मुझरबानीने त्याच्या बॉलचा स्पीड कमी केला, ज्यामुळे संजूचा शॉट चुकला आणि डीप मिडविकेटवर रायन बर्लने कॅच पकडला.
संजू लवकर आऊट झाला असला तरी भारताला चांगली सुरूवात मिळाली, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरने संजूची पाठ थोपटली. दुसरीकडे रवी शास्त्री आणि सुनिल गावसकर यांनी संजूच्या शॉटबद्दल नाराजी व्यक्त केली. या शॉटमुळे संजू नाराज होईल, असं रवी शास्त्री कॉमेंट्री करताना म्हणाले. तर गावसकरांनीही सॅमसनच्या आऊट होण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विरोधी टीम संजूला वारंवार शॉर्ट बॉल टाकून आणि स्क्वेअर लेगवर फिल्डर लावून सापळ्यात अडकवतात, असं गावसकर म्हणाले.
वेस्ट इंडिजविरुद्ध विजय गरजेचा
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने विजय मिळवलेला असला तरी आता टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं आव्हान सुपर-8 स्टेजलाच संपुष्टात येईल.
