या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असला तरी जेकब बेथलने एकट्याने दिलेल्या झुंजीचं फक्त इंग्लंडच नाही तर भारतीय क्रिकेट चाहतेही कौतुक करत आहेत. पहिल्या इनिंगनंतर इंग्लंड सामना जिंकेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण बेथलने इंग्लंडला शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅचमध्ये ठेवलं. पॉवर प्लेमध्ये इंग्लंडने 3 विकेट गमावल्या होत्या, पण बेथलने जॅक्सच्या मदतीने 39 बॉलमध्ये 77 रनची पार्टनरशीप केली आणि इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या.
advertisement
टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेलने पॉवर प्लेमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा उत्कृष्ट कॅच घेतला, त्यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर डीप पॉईंटवर अक्षरने अफलातून फिल्डिंग करून जॅक्सलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दोन्हीपैकी कोणता कॅच निर्णायक होता? असं बेथलला विचारण्यात आलं, तेव्हा त्याने जॅक्सचं आऊट होणं धक्का होतं, असं उत्तर दिलं. 'ब्रुकचा कॅचही चांगला होता, पण तेव्हा मॅचमध्ये बऱ्याच ओव्हर शिल्लक होत्या. मी आणि विल जॅक्स जेव्हा पार्टनरशीप करत होतो, तेव्हा जॅक्सची विकेट गमावणं मोठा धक्का होता', असं बेथल म्हणाला आहे.
'बुमराह बॉलिंग करत असताना पुढच्या ओव्हरमध्ये विल जॅक्स क्रीजवर राहिला असता, तर आम्ही त्याच्यावर अधिक दबाव आणू शकलो असतो आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 30 रनची गरज भासली नसती. जॅक्सच्या विकेटने मॅचचं चित्र बदललं', अशी कबुली बेथलने दिली. इंग्लंडच्या पराभवाला एका प्रकारे बेथलने विल जॅक्सला जबाबदार धरलं आहे.
'बुमराह भारताचं ट्रम्प कार्ड होता. त्याने 18व्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन देऊन भारताचा विजय निश्चित केला. मी वरुण चक्रवर्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण बुमराहचे बॉल मारणं खूप कठीण आहे. आम्ही त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याच्या कौशल्याचा सर्वोत्तम वापर केला, याचं श्रेय त्याला जातं', असं वक्तव्य जेकब बेथलने केलं आहे.
