संजू सॅमसन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने 50 बॉलमध्ये नाबाद 97 रनची खेळी केली. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला कोणत्याही भारतीय खेळाडूचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. मागची बरीच वर्ष संजू सॅमसन टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत होता, पण त्याला टीममधलं स्वत:चं स्थान निश्चित करता येत नव्हतं. यात अनेकवेळा त्याची चूकही नव्हती. अखेर संजूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्वत:ला सिद्ध केलं.
advertisement
फक्त संजूच नाही तर वडिलांचाही संघर्ष
टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या संजूचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. फक्त संजूच नाही तर त्याच्या वडिलांनीही मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. संजू सॅमसन हा उत्तर दिल्लीच्या जीटीबी नगरमधील पोलीस कॉलनीमध्ये लहानाचा मोठा झाला. संजूचे वडील सॅमसन विश्वनाथन हे फूटबॉल खेळाडू होते, त्यांनी संतोष ट्रॉफीमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं, तसंच ते दिल्लीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणूनही काम करत होते.
दिल्लीतील एका ज्युनियर स्पर्धेत, संजूने आठ सामन्यांमध्ये 500 हून अधिक रन केल्या, पण तरीही त्याची अंडर-13 टीममध्ये निवड झाली नाही. टीममध्ये निवड होत नसल्याने संजू रडत घरी आला. एका दुपारी संजू सॅमसन हा सराव करत होता, तेव्हा वडील त्याचा सराव पाहायला गेले. तुमच्या मुलाला श्रीलंकेच्या टीममध्ये आणण्याचा प्रयत्न करताय का? असा प्रश्न बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने संजूच्या वडिलांना विचारला.
'लोक खूप काही बोलतात, पालक म्हणून माझ्या मुलासाठी सर्वोत्तम देणे हे माझं काम आहे', अशी प्रतिक्रिया संजूच्या वडिलांनी दिली आहे. दिल्लीच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये प्रवेश करणं सोपं नाही, हे संजूच्या वडिलांना लक्षात आलं, तेव्हा त्यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आणि ते तिरुवनंतपुरमला गेले. तिरुवनंतपुरममध्ये संजूने पुन्हा त्याचा खेळ नव्याने सुरू केला आणि इथेच त्याचा खेळ आणखी बहरला. पुढे अंडर-19 वर्ल्ड कप, आयपीएलमध्ये यश मिळवत संजूची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली.
