मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नेप्च्यून स्वराज सोसायटीचे सेक्रेटरी सुरेश उपाध्याय यांनी काही तरुणांना सोसायटीच्या आवारात दारू पिऊन येऊ नका, अशी समज दिली होती. यावरून त्यावेळी मोठा वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी संकेत जाधव याने उपाध्याय यांच्या गाडीची काचही फोडली होती. मात्र, संकेतने त्यावेळी माफी मागितल्याने सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. परंतु, हाच संयम आता त्यांच्या अंगाशी आला आहे.
advertisement
डोक्याला सहा टाके पडले
होळीच्या दिवशी जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी संकेत जाधव, सुशांत जाधव आणि राहुल पाटील या तिघांनी उपाध्याय यांचा मुलगा अमन याला गाठले आणि त्याला मारहाण सुरू केली. अमनने जिवाच्या आकांताने घराच्या दिशेने धाव घेतली, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अमनला वाचवण्यासाठी त्याचे वडील सुरेश उपाध्याय आणि शेजारी राहणारे शशिकांत गुप्ता मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र आरोपींनी या दोघांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शशिकांत गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत.
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/Sequence-06-2026-03-0602cbd60f63d386687ae6f80d306fb2.mp4"][/video]
पोलिसांत गुन्हा दाखल; दहशतीचे वातावरण
या घटनेनंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज असूनही सोसायटीत उघडपणे गुंडागिरी करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. वारंवार होणाऱ्या अशा त्रासामुळे नेप्च्यून स्वराज सोसायटीतील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टिटवाळा पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना कधी बेड्या ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
