जागांच्या वाटाघाटीसाठी ठाण्यातील वर्तकनगरमध्ये भाजपा कार्यालयात जिल्हा पातळीवरील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक मध्यरात्रीपासून सुरू होऊन पहाटे ४ वाजेपर्यंत चालली, तरीही दोन्ही बाजूंकडून होणारी ओढाताण थांबलेली नाही. हा तिढा सोडवणं महायुतीसाठी हळूहळू डोकेदुखीचं होत चाललं आहे. त्यामुळे महायुतीचं टेन्शनही वाढलं आहे. एकीकडे उबाठा आणि मनसे यांची युती राजकीय वर्तुळात नवं वळणं घेऊन आली असताना महायुतीमध्ये मात्र अजूनही जागा फायनल होत नसल्याचं दिसत आहे.
advertisement
जागांच्या आकड्यांवरून खडाजंगी
बैठकीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिकांच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची रस्सीखेच पाहायला मिळाली. दोन्ही महापालिकांवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अनेक जागांवरून नेत्यांमध्ये 'घमासान' चर्चा झाली, मात्र ठोस तोडगा निघू शकला नाही.
कुठे अडलंय युतीचं घोडं?
महायुतीमध्ये दोन्ही महापालिकांच्या काही ठराविक जागांवरून पेच निर्माण झाला आहे. ठाण्यात साधारण ३ ते ५ जागांवरून दोन्ही पक्षांनी आपला दावा सोडलेला नाही. या जागा युतीच्या विजयासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात असल्याने तिथे पेच वाढला आहे. केडीएमसीमध्ये जागावाटपाचा तिढा अधिक मोठा असून, येथे ५ ते ७ जागांवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
वर्तकनगरच्या भाजपा कार्यालयात झालेल्या या बैठकीला दोन्ही पक्षांचे जिल्हा स्तरावरील बडे नेते उपस्थित होते. युती टिकवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असले, तरी स्थानिक गणिते आणि कार्यकर्त्यांचा दबाव यामुळे स्थानिक नेते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पहाटेपर्यंत चाललेल्या या चर्चेनंतरही काही जागांचा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
पुन्हा महाबैठकांचं सत्र सुरू
पहाटे ४ पर्यंत चाललेली ही चर्चा अनिर्णित राहिल्यामुळे, आता उद्या रात्री पुन्हा एकदा युतीची निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उर्वरित जागांचा तिढा सोडवून अंतिम जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात या 'रस्सीखेची'चीच चर्चा रंगणार आहे.
