ठाणे महापालिकेने प्रवाशांना दिला मोठा दिलासा
ठाणे शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांपेक्षा जास्त झाली असून सार्वजनिक वाहतुकीची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र उपलब्ध बसांची संख्या कमी असल्याने अनेक नागरिकांना खासगी वाहन, रिक्षा किंवा इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन विभागाने बस ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
महापालिकेचा नवा प्लॅन काय?
ठाणेकरांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने मोठी तयारी सुरू केली आहे. साधारण मार्च 2027 पर्यंत परिवहन सेवेत एकूण 360 नवीन बस दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे. या ताफ्यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा समावेश असणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान अंतर्गत यापूर्वीच ठाणे परिवहन सेवेत 123 इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहेत. या बसमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत प्रदूषणमुक्त वाहतुकीचा लाभ मिळत आहे.
नवीन आर्थिक वर्ष अर्थात 2026-27 मध्ये आणखी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पीएमई योजनेंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 160 बस आणि महापालिकेच्या परिवहन विभागाकडून 100 सीएनजी बस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल केल्या जातील. मार्च 2027 पर्यंत एकूण 360 बस ताफ्यात सामील होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नव्या बसमुळे शहरातील विविध मार्गांवर बसफेऱ्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
