भिवंडी: मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये भिवंडीतील दोन रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील दोन ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात वेगवान वाहनाने पाठीमागून रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला आहे. भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजकुमार गुप्ता (वय 40 वर्षे) आणि महेंद्र केसरवानी (वय 39 वर्षे) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (MH 04 KA 3124) भिवंडी बायपास मार्गे सोनाळे दिशेने जात होते.
advertisement
दरम्यान, त्यांची ऑटो रिक्षा मुंबई–नाशिक महामार्गावरील सोनाळे जवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला आहे. रिक्षातून चालक राजकुमार गुप्ता आणि महेंद्र केसरवानी हे बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे दोघेही जबर जखमी झाले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झालं.
घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. तत्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत. ज्या वाहनाने धडक दिली त्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.
