अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षामुळे राज्यातील द्राक्ष, केळी आणि आंबा निर्यातीला मोठा फटका बसतोय. हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रतीक्षेत अडकले आहेत. याशिवाय आखाती देशांमध्ये निर्यातीच्या तयारीत असलेले कांदा, केळीचे सुमारे एक हजार कंटेनर शनिवारपासून जेएनपीए बंदरात अडकले आहेत. निर्यात होत नसल्यानं जेएनपीटीमध्ये अडकलेला कांदा खराब होऊ नये यासाठी तो पुन्हा एपीएमसी बाजारात विक्रीसाठी आणण्यात आला आहे...30 टन कांद्याचा कंटेनर एपीएमसीत दाखल झाला असून 9 ते 10 रुपये किलो भावानं हा कांदा विकला जात आहे.
advertisement
द्राक्षांसोबतच हळदीलाही फटका
सांगली जिल्ह्यातून निर्यात होणा-या द्राक्षांसोबतच हळदीलाही फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल 15 हजार 800 रुपयांचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी उतरला आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळी इराणमध्ये निर्यात केली जात होती. मात्र युद्ध सुरु झाल्यापासून ही निर्यात ठप्प झाली आहे. केळी शेतातच पडून असून फुकट घेऊन जा असं सांगूनही व्यापारी फिरकत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकरी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत
आखाती युद्धाची झळ भंडाऱ्याला भाजीपाला मार्केटला बसली आहे. या मार्केटमधून दररोज 15 ते 20 टन उच्च प्रतीची भेंडी केवळ आखाती देशांत निर्यात केली जायची. मात्र गेल्या आठवड्याभरापासून हा माल बाजारातच पडून आहे. युद्धामुळे निर्यात रखडल्यानं पंढरपुरातील सर्वच कोल्ड स्टोरेज हाऊसफुल्ल झाले आखाती देशात निर्यात होत नसल्यानं शेतकऱ्यांनी सर्व माल कोल्ड स्टोरेजमध्ये आणून ठेवलाय.निर्यातीसाठी तयार झालेली द्राक्ष आणि केळी मोठ्या प्रमाणात या स्टोरेजमध्ये दिसून येतायत. मायदेशात या मालाला अपेक्षित किंमत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी सध्या वेट अँड वॉचचा पर्याय स्विकारला आहे.
शेतकऱ्यांसमोर युद्धामुळं आणखी एक संकट
सध्या रमजानचे दिवस सुरु आहेत. यावेळी आखातात सर्वात जास्त निर्यात होते ती फळांची आणि त्यात हापूस आंबा कसा मागे राहिलं पण युद्धामुळे कोकणच्या या राजाला मोठा फटका बसतोय. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा दाखल होतोय. पण निर्यातीवर पूर्ण बंदी असल्यानं त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. एकूणच आखातातील युद्धजन्य परिस्थितीनं थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.आधीच अस्मानी संकटानं पिचलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर या युद्धामुळं आणखी एक संकट उभं राहिलंय.
