लग्नमंडपात रक्ताचा सडा! वरमाला सुरू असतानाच प्रियकराने नववधूवर झाडली गोळी आणि... धक्कादायक घटनेचा Video समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार बिहारमधील बक्सर जिल्ह्यात घडला आहे. उत्तर प्रदेशातून वरात आली होती, सगळीकडे जल्लोष होता, पण एका माथेफिरूच्या कृत्याने या लग्नमंडपाचे रूपांतर गोंधळात झाले.
बिहार : लग्न म्हटलं की सनई-चौघड्यांचे सूर, आनंदाचं वातावरण आणि दोन जीवांच्या नव्या प्रवासाची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या डोळ्यांत आपल्या लग्नाबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल अनेक स्वप्नं असतात. पण विचार करा, ज्या क्षणी नववधू आपल्या होणाऱ्या पतीच्या गळ्यात वरमाला घालणार असते, त्याच वेळी बंदुकीची गोळी सुटली आणि आनंदाच्या सुरांचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये झाले तर..... हे नुसतं वाचूनच अंगावर काटा येतो ना?
असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार बिहारमधील बक्सर जिल्ह्यात घडला आहे. उत्तर प्रदेशातून वरात आली होती, सगळीकडे जल्लोष होता, पण एका माथेफिरूच्या कृत्याने या लग्नमंडपाचे रूपांतर गोंधळात झाले.
बक्सरच्या चौसा परिसरात मंगळवारी रात्री आरती कुमारी (18) हिच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. उत्तर प्रदेशातील बलिया येथून बारात दारात आली होती. गाणी-बजावणी सुरू असताना आरती आणि तिचा होणारा पती वरमालेसाठी स्टेजवर उभे होते. नवरा-नवरीची आरती ओवाळली जात होती, तितक्यात मास्क घालून आलेल्या एका तरुणाने मुलींच्या गर्दीतून पुढे येत थेट आरतीच्या पोटावर गोळी झाडली. गाण्यांच्या मोठ्या आवाजात गोळीचा आवाज दबला गेला, पण काही क्षणांतच आरती रक्ताच्या थारोळ्यात स्टेजवर कोसळली आणि लग्नमंडपात एकच खळबळ उडाली.
advertisement
"मला दीनबंधूने गोळी मारली..."
गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आरतीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वेदनेने विव्हळत असतानाही आरतीने गुन्हेगाराचे नाव सांगितले. ती म्हणाली, "मला दीनबंधूने गोळी मारली आहे." आरतीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वाराणसीला हलवण्यात आले आहे आणि तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
एकतर्फी प्रेम की जुनं प्रकरण?
या घटनेतील आरोपी दीनबंधू हा आरतीचा शेजारीच आहे. मुलीच्या वडिलांचा दावा आहे की "दीनबंधू माझ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करायचा. आरतीला तो आवडत नव्हता, म्हणून आम्ही तिचे लग्न दुसरीकडे ठरवले." स्थानिकांच्या मते, त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वीही आरतीचे लग्न ठरले होते, पण दीनबंधूने अडथळे आणल्याने ते लग्न तुटलं होतं. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. ते म्हणतात, "जर मुलाच्या प्रेमाबद्दल आम्हाला माहिती असती, तर आम्ही विनंती करून त्यांची लग्न लावून दिले असते, पण अशा घटनेची वेळ येऊ दिली नसती."
advertisement
🚨हैरान और स्तब्ध कर देने वाली खबर।
बताया जा रहा है कि बक्सर में जयमाला के वक्त दुल्हन को स्टेज पर ही गोली मार दी गई😢,दूल्हे और भीड़ की मौजूदगी में।
हम किस तरह के समाज की ओर बढ़ रहे हैं? हालात चिंताजनक हैं।#Bihar #Buxar pic.twitter.com/fyDcjo5ABZ
— टिम्बर मर्चेंट 😉 (@Merchant00024) February 25, 2026
advertisement
लग्नाचं घर बनलं पोलीस छावणी
या गोळीबारानंतर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. त्यांना या प्रकरणाची काहीही कल्पना नसल्याने त्यांनी लग्नाशिवायच वरात परत नेली. पोलिसांनी आरोपी दीनबंधूच्या घराला सील ठोकले आहेत आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत.
सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भर लग्नात, शेकडो लोकांच्या उपस्थितीत अशा प्रकारे गोळीबार होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्रेमाच्या नावाखाली होणारा हा हिंसाचार एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला आहे. आज आरती मृत्यूशी झुंज देत आहे, तर तिचा प्रियकर म्हणवणारा दीनबंधू फरार आहे. या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सामाजिक स्तरावर विकृत मानसिकतेचे तरुण किती भयानक पाऊल उचलत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 5:24 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नमंडपात रक्ताचा सडा! वरमाला सुरू असतानाच प्रियकराने नववधूवर झाडली गोळी आणि... धक्कादायक घटनेचा Video समोर







